Boli bhasha in maharashtra

बोलीभाषा आणि ज्ञानभाषेचे नाते मायलेकीचे
bolibhasha
boli bhasha in maharashtra
boli bhasha in marathi
maharashtratil boli bhasha

१२५ वर्षांपूर्वीची तुकारामाची कविता त्यांच्या बोलीभाषेत निर्माण झाल्यामुळे तिला आज महत्व प्राप्त आहे. बुद्धांनी बोलीभाषेतून आपले चिंतन मांडले नसते तर म्यानमार ते भारत-श्रीलंकेपर्यंत बौद्धधर्माचे विस्तारीकरण झाले नसते. बोलीभाषेतून ह्रदयाचे संवाद दुसऱ्या ह्रदयापर्यंत पोहोचतात. शाहिरांनी सुद्धा बोलीभाषेचा वापर करीत प्रबोधनाला मनोरंजनाची सांगड घालून लोकभाषेला साद घालत लोकांच्या मनात खोलवर प्रभाव करीत जनजागृती केली. अशिक्षित असलेल्या बहिणाबाईंच्या कविता अहिराणी या लोकभाषेतूनच तयार साहित्यात शेण, शेत, ग्रामीण जीवनाच्या तत्वज्ञानांमुळे चिरंतर झालेली आहे. कोकणात कोकणी, मालवणी, विदर्भातील वऱ्हाडी, झाडीबोली, गोंडीभाषा, मराठवाडय़ात मराठवाडी, पारध्यांची भाषा, बंजाऱ्यांची भाषा आदि बोलीभाषेंचा प्रवाह अखेर ज्ञानभाषा मराठीला जाऊनच मिळतो. यामुळे या दोन्ही भाषेत मायलेकीचे नाते जाणवते, असे प्रतिपादन या विषयावरील परिसंवादात वक्त्यांनी केले.
विनायकराव कोतवाल सभागृह, भवभूति रंगमंदिर कन्हारटोली येथे आयोजित ६२ व्या विदर्भ साहित्य संमेलनात ‘बोलींमुळेच मराठी साहित्य सकस झाले आहे’ या विषयावरील परिसंवादात िहगणघाटचे डॉ.गणेश चव्हाण यांनी लिखित नसलेली, पण समूहाने विशिष्ट क्षेत्रात जी भाषा बोलली जाते तिला बोलीभाष म्हणतात. ही लोकभाषा मौखिक परंपरा, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये जोपासत असतात. ही भाषा सतत बदलत असते, हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. रुढी-परंपरेचा अविष्कार आपण बोलीभाषेतूनच करत असतो. या बोलीभाषेतील नवनवीन शब्दच प्रमाण भाषेत वापरात येत असतात. बोलीभाषेचा स्वीकार केल्यास मराठी भाषाच अधिक समृद्ध होईल व त्यामुळे बरेच साहित्यही बोलीभाषेतूनच निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून वामनराव तेलंग, डॉ.इसादास भडके, डॉ.अशोक भक्ते, प्रा.अजय चिकाटे, डॉ.गणेश चव्हाण, डॉ.तीर्थराज कापगते उपस्थित होते. या परिसंवादातील अध्यक्षीय भाषणात वामनराव तेलंग म्हणाले, साठोत्तरी साहित्य व वाड्;मयाचे पडसाद समाजात उमटले. शिक्षणाचा प्रसार होत गेला. प्रत्येक समाजाचे लोक शिकत गेले. त्यामुळे मग त्यांना या साहित्याची जाण आली. आज झपाटय़ाने जग बदलत आहे. अशा काळात मराठी भाषेसमोर उभी राहणारी आव्हाने कशी पेलणार? बोलीभाषा समृद्ध आहे, पण कुठलीही बोलीभाषा ज्ञानभाषा झाली नाही. झाडीबोलीतील साहित्यशास्त्र कुठेतरी पोहोचेल म्हणून अंतराळातील शास्त्र, भौगोलिकशास्त्र, गणित, संगणकशास्त्र यापर्यंत कोणतीच बोलीभाषा पोहोचली नाही. यांचा ज्ञानभाषेतच अभ्यास करावा लागतो. याकरिता बोलीभाषेला आणखी प्रवास करावा लागणार आहे. साहित्यिकांनाही प्रयत्न करावा लागणार आहे. बोलीभाषेचे ज्ञान शब्दकोषांमध्ये आले पाहिजे. मराठीतून याबाबतचे प्रयत्न विद्यापीठातून चालविले गेले पाहिजे. याकरिता मानसिकरित्या तयारी करावी लागणार आहे. यात साहित्यिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान त्यांनी केले. या परिसंवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रसन्नजीत गायकवाड यांनी, तर आभार संगीता निगुळकर यांनी मानले.

‘झाडीबोली’ ही मराठीतील एक बोली असली तरी ती वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध आहे. प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांतील काही शब्द नेमके उलट अर्थाने वापरले जातात, तर काही शब्दांचा उच्चारही वेगळा केला जातो. या बोलीत काही शब्दांच्या बाबतीत असलेले वैविध्य प्रमाण मराठी भाषेमध्येही आढळत नाही.
भं डारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखला जातो. ‘लीळाचरित्र’कालीन प्राचीन मराठी वाङ्मयात या भूभागाचा उल्लेख ‘झाडीमंडळ’ असा करण्यात आलेला आहे. घनदाट अरण्ये आणि पाण्याने तुडुंब भरलेले तलाव यांचे वरदान या प्रदेशाला लाभले आहे. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला असलेला हा भूप्रदेश आपल्या अनेक वैशिष्टय़ांसह स्वत:ची वेगळी बोली राखून आहे. ही बोली ‘झाडीबोली’ म्हणून ओळखली जाते.
ही प्रमाण मराठीचीच उपबोली असली तरी अनेक बाबतीत ती मराठीहून वेगळी आहे. अगदी वर्णाचा विचार करता मराठीतील ‘ण, छ, श, ष आणि ळ’ ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. ‘छ, ष आणि श’ या तीन व्यंजनांऐवजी ‘स’ हे एकच अक्षर वापरले जाते. म्हणजे ‘छगन’, ‘छत’ हे शब्द ‘सगन’, ‘सत’ असे उच्चारले जातात. तर ‘शीत’, ‘शेर’ हे शब्द ‘सीत’, ‘सेर’ असे उच्चारले जातात. या बोलीत ‘ण’चा उच्चार ‘न’ असा केला जातो. ‘बाण’, ‘आण’ हे शब्द ‘बान’, ‘आन’ असे उच्चारले जातात. या बोलीत ‘ळ’ऐवजी ‘र’ वापरला जातो. म्हणजे ‘काळा कावळा’ हे शब्द झाडीबोलीत ‘कारा कावरा’ असे उच्चारले जातात. ‘चांगला’, ‘चोर’, ‘जातो’, ‘जमले’ हे शब्द ग्रामीण झाडीभाषकाकडून ‘च्यांगला’, ‘च्योर’, ‘ज्यातो’, ‘ज्यमले’ असे उच्चारले जातात.
झाडीबोलीत नपुंसकिलग नाही. या बोलीचा संसार केवळ पुल्िंलग व स्त्रीिलग या दोनच िलगांवर चालतो. त्यातही नामांना कोणत्या लिंगात वापरावे याचे या बोलीचे स्वत:चे असे तंत्र आहे. प्रमाण मराठीतील ‘नाटक, पुस्तक’ ही नपुंसकिलगी नामे झाडीबोलीत स्त्रीिलगी वापरली जातात. तसेच ‘घर, चित्र’ ही नपुंसकिलगी नामे झाडीबोलीत पुल्लिंगी वापरली जातात. आकारांत नामे पुल्िंलगी समजावीत असा सरसकट नियम दिसतो. त्यामुळे ‘जागा, हवा’ ही प्रमाण मराठीतील स्त्रीिलगी नामे झाडीबोलीत पुल्िंलगी स्वरूपात वापरली जातात. विशेषत: त्यांचे सामान्यरूप करताना हे स्पष्टपणे लक्षात येते. येथे ‘जागेवर’, ‘हवेचा’ असे न म्हणता झाडीबोलीत ‘जाग्यावर’, ‘हव्याचा’ असे पुल्िंलगी नामाप्रमाणे त्यांचे रूप होताना दिसते. इकारान्त पुिल्लगी नामाचे सामान्यरूप करताना यकारान्त करावे, हा मराठीतील नियम झाडीबोलीत अशा सर्वच नामांकरिता सरसकट वापरण्यात येतो. त्यामुळे ‘हत्ती’ आणि ‘नंदी’ यासारख्या शब्दांचे उच्चार ‘हत्त्या’ आणि ‘नंद्या’ असे केले जातात. अनेकवचन करतानाही झाडीबोली काहीएक वेगळेपण सांभाळते. ‘केस’, ‘वावर’, ‘पापड’ या पुिल्लगी शब्दांचे अनेकवचन ‘केसा’, ‘वावरा’, ‘पापडा’ असे केले जाते.
विशेषणांच्या बाबतीत झाडीबोलीची स्वत:ची अशी लकब दिसून येते. रंगांचा गडदपणा सांगण्यासाठी ‘पिवरालट, काराघोर’ अशी विशेषणे वापरली जातात. मराठीत केवळ आकारांत विशेषणांचे सामान्यरूप होते. झाडीबोलीत सर्वच विशेषणांचे तसे होते. उदाहरणार्थ : ‘पाच- पाचा बोटायना’, ‘जूग- जुगा दिसाना’, ‘लोबी- लोब्या मानसाचा’.. इत्यादी. मासोळीच्या गंधाकरिता ‘इसडय़ान’, कुबट वासाकरिता ‘घुटऱ्यान’, मोहाच्या वासाकरिता ‘मोयान’ अशी वेगळी विशेषणे या बोलीने निर्माण केलेली आहेत. पाचक (म्हणजे पाच), बाराक (म्हणजे बारा) असे संख्यांचे उच्चार केले जातात.
‘करीत आहे’ असे न म्हणता ‘करून रायलू’ असे म्हटले जाते. संयुक्त वाक्याची वेगळी रचना झाडीबोलीत वापरली जाते. ‘मी गेलो आणि तेव्हाच ती मेली’ हे प्रमाण मराठीतील वाक्य झाडीबोलीत ‘मी जावासीन ना ते मरावासीन’ अशा प्रकारे म्हटले जाते. हे या बोलीचे वेगळेपण म्हणावे लागेल. या व्याकरणिक ‘अर्थ’व्यवहारास मी ‘संयोगार्थ’ असे नाव दिले आहे. झाडीबोलीत विपुल प्रयोजक क्रियापदे प्रचारात असून या बोलीने ‘इदरना- इदरावना, डकर-डकरावना’ यांसारखी ‘आव’ प्रत्यय असलेली तसेच ‘खलना- खलारना, डकरना- डकरावना’ अशी स्वत:ची वेगळी प्रयोजक रूपे निर्माण केली आहेत. एरव्ही नेहमी प्रयोजक रूप होत असताना वर्णवृद्धी होते. पण झाडीबोलीत ‘कोंडारना- कोंडना’ हे रूप उलट प्रकारे झाले आहे. म्हणजे येथे वर्णवृद्धी न होता वर्णलोप झालेला आहे. केवळ ‘गाडणे’ हे प्रयोजक क्रियापद प्रमाण मराठीत ऐकायला मिळत असले तरी त्याच्या ‘गडना’ या मूळ रूपासह ‘गडना-गाडना’ ही दोन्ही रूपे झाडीबोलीत प्रचलित आहेत.
झाडीबोलीत क्रियाविशेषण अव्ययांचे भांडार विशाल असून त्यात अभ्यस्त शब्दांचे आधिक्य आहे. ‘उलूउलू, घडीघडी’ अशी अनेक क्रियाविशेषणे या बोलीत आहेत. अभ्यस्ततेचा उपयोग ही बोली स्वत:च्या पद्धतीने करताना दिसते. ‘पटपट, खटखट’ या प्रमाण मराठीतील शब्दांकरिता ‘पटोपटो, खटोखटो’ अशी ओकारान्त रूपे ही बोली स्वीकारतेच; शिवाय ‘पटना, खटना’ अशी ‘ना’ प्रत्यय असलेली आणि ‘पटनारी, खटनारी’ अशी ‘नारी’ प्रत्यय असलेली वेगळी क्रियाविशेषणेसुद्धा ही बोली निर्माण करते. म्हणजेच प्रमाण मराठीतील एका क्रियाविशेषण अव्ययाकरिता हा बोली आणखीन तीन पर्याय देते. अशी ही शब्दश्रीमंत बोली आहे.
उभयान्वयी अव्ययांच्या संदर्भात ‘आणि’ या अर्थाने ‘ना/ अना’; तसेच ‘किंवा’ या अर्थाने ‘नाईतं’ हे उभयान्वयी अव्यय झाडीबोलीत वापरले जाते. प्रमाण मराठीतील ‘इश्श’ या प्रख्यात केवलप्रयोगी अव्ययाऐवजी ‘आमीनाईजा’ हे वेगळे केवलप्रयोगी अव्यय झाडीबोलीत वापरले जाते. या बोलीत ‘मस्त’ या अव्ययाला वेगवेगळ्या अर्थछटा असून त्याचा ‘छान, खूप, फार’ अशा भिन्न भिन्न अर्थाने वापर केला जातो. शिवाय ‘बापा’सारखे शब्द फक्त याच बोलीत सहजगत्या वापरले जाऊ शकतात.
नातेविषयक शब्दांच्या बाबतीत झाडीबोली प्रमाण मराठीपेक्षा कितीतरी पुढे आहे. मोठय़ा दीराला प्रमाण मराठीत वेगळे नाव नाही. झाडीबोलीत त्यास ‘भासरा’ असे म्हणतात. तसेच वडिलांच्या मोठय़ा भावाला प्रमाण मराठीत वेगळा शब्द नाही. त्यास ‘माहालपा’ आणि त्याच्या बायकोस ‘माहालपी’ असे झाडीबोलीत म्हणतात. नवऱ्याच्या लहान व मोठय़ा बहिणीला प्रमाण मराठीत ‘नणंद’ या एकाच नावात गोवण्यात आले आहे. इथे नवऱ्याच्या मोठय़ा बहिणीला ‘आक्सू’ असे म्हटले जाते. ‘भारतीय भाषाकोश’ धुंडाळला असता भारतातल्या कोणत्याच भाषेत नवऱ्याच्या मोठय़ा बहिणीला असे वेगळे नाव दिल्याचे आढळत नाही. शिवाय झाडीबोली नणंदेच्या नवऱ्याला ‘नंदवा’ आणि आक्सूच्या नवऱ्याला ‘आक्सवा’ ही वेगळी नावे वापरून प्रमाण मराठीवर कुरघोडी करताना दिसते.
प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांच्या संदर्भात काही शब्द उलट अर्थाने वापरले जातात. ‘अवगत’ या प्रमाण मराठीतील शब्दाचा अर्थविपर्यास करून झाडीबोलीने त्याचा ‘उपेक्षा’ हा अर्थ घेतला आहे. तसेच प्रमाण मराठीतील गाण्याशी संबंधित ‘गायकी’ हा शब्द ‘गाई राखणारा’ या अर्थाने झाडीबोली वापरते. ‘हाकलणे’ हे क्रियापद प्रमाण मराठीप्रमाणे ‘बाहेर घालवणे’ या अर्थाने न वापरता झाडीबोली अगदी त्याच्या विरुद्ध म्हणजे ‘बोलावणे’ या अर्थाने वापरते. अर्थात संत तुकारामांनीदेखील आपल्या अभंगात हे क्रियापद या अर्थाने वापरले आहे याची इथे आठवण व्हावी.
मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत ‘विवेकसिंधू’मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथातील चक्रधरांना आवडती असलेली ‘भेली’ ही ‘गूळ’ या अर्थाने आजही येथे वापरली जाते. महदाइसेने उल्लेखिलेला आणि तिला अर्थ न कळलेला ‘आहाता’ हा धिरडय़ाच्या जमातीतला चविष्ट पदार्थ नावासह आजही झाडीपट्टीतील भोजनपटूंच्या जिभेचे चोचले पुरवीत आहे. ‘र’ आणि ‘रव’ यांच्यामुळे संपादकांच्या डोक्यात शब्दभ्रम निर्माण करणारा ज्ञानेश्वरीतील ‘सुरवाड’ हा शब्द आजही इथे सासरी जाणाऱ्या आपल्या लेकीला निरोप देणाऱ्या मातेच्या तोंडात ‘सुकासुरवाडा’ असा ऐकायला मिळतो. अशा प्रकारे विद्वानांनाही न कळणारे आणि केवळ शब्दकोशात लपून असलेले आपल्या जुन्या ग्रंथांतील अनेक शब्द झाडीबोली आजही आपल्या दैनंदिन व्यवहारात सहज वापरताना दिसते. झाडीपट्टीत वृक्षांचे वैपुल्य आहे. त्यांना दिलेली नावेही विचित्र व वेगळी आहेत. ‘छिद्र’ या शब्दाचे विभाजन करून ‘सेद’ व ‘दर’ हे दोन पर्याय निर्माण केले आहेत. शिवाय आणखी सोळा वेगवेगळे पर्याय निर्माण करून झाडीबोलीने आपली अभूतपूर्व प्रसवक्षमता सिद्ध केली आहे. कुंभाराने घडवलेली मडकी आणि बुरडाने तयार केलेल्या वस्तू यांची पन्नासाच्या वर नावे या बोलीत आहेत. हे सारे शब्दभांडार स्वीकारून मराठीने आपली शब्दसंपदा वृिद्धगत केली तर मराठी भाषेला इंग्रजी शब्दांचा आधार घ्यावा लागणार नाही. आणि अमुक इंग्रजी शब्दाला समर्पक मराठी पर्याय नाही अशी तक्रार करण्याचीही गरज भासणार नाही.

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात झाडी बोली बोलली जाते. या बोलीचे वऱ्हाडी बोलीशी साम्य आहे तसेच हिंदीभाषिक प्रदेशामुळे या भाषेचाही प्रभाव काही प्रमाणात आहे. हिंदीतील अनेक शब्द, प्रमाण मराठीतील शब्द या बोलीत वापरले जात असले तरी या बोलीची म्हणून स्वतंत्र शब्दसंपदा आहे. तिच्या वैशिष्टय़ांची आणि अर्थप्रवाहीपणाची साक्ष ती देते.
झाडीपट्टीतील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरातील लोक प्रामुख्याने मराठीभाषी आहेत. याभागात झाडीबोली बोलली जाते. हा भूभाग पूर्वी मध्यप्रदेशात असल्यामुळे येथील अद्यापही हिंदी भाषेचा अंशत: प्रभाव असल्याचे दिसून येते. शब्द आणि उच्चार हिंदी मिश्रित आहेत. घरात आल्यावर मराठी व घराचा उंबरठा पार केल्यावर हिंदी भाषा बोलली जाते. मध्य प्रदेशातील बालाघाट, भिलाई, जबलपूर या हिंदी भाषी शहरांत काही प्रमाणात मराठी बोलली जाते. कारण विदर्भातून बहुतेक मराठी भाषी लोकांनी कामधंद्यासाठी मध्यप्रदेशात स्थलांतर केलेले आहे. या परिसरात पूर्वी विस्तीर्ण जंगलं पसरलेली होती. त्यामुळे नजीकच्या वऱ्हाड वा तत्सम भागातील लोक झाडीपट्टीला ‘झाळी’ आणि येथील लोकांना ‘झाडप्या’ म्हणतात, अर्थात गमतीने!
झाडीबोलीत ‘तो जाऊन राह्य़ला’, ‘येऊन राह्य़ला’ असे बोलतात. तसेच ‘मले’ (मला), ‘तुले’ (तुला), ‘कायले’ (कशाला) असे शब्द-प्रयोग केले जातात. काही प्रयुक्त होणारे शब्द असे आहेत- कुठे- कोठी, उद्या- सकारी, रोग-बेमारी, ऊन-तपन, ताप-बुखार, बाजार-बजार, कशाला- कायले. का?- काहून? या बोलीत ‘ळ’ ऐवजी ‘र’ वापरला जातो, जसे- डाळभात- दारभात, शिवीगाळ, गारी, पळाला- पराला, दिवाळी- दिवारी, पोळा- पोरा, आभाळ- अभार, डोळा- डोरा इत्यादी.
याशिवाय नित्य व्यवहारातील बोलणंही वेगळ्या वळणाचं व वैशिष्टय़पूर्ण आहे. मुला-मुलीचं लग्न लागलं- ‘नवरा नवरीचा ढेंढा लागला.’ ‘ढेंढा’ याचा अर्थ अद्यापही कळला नाही. मुलीला समजून देताना आई म्हणते, ‘माय माझे, असी करू नोको’, तसेच मुलाला नात्यातील एखादी बाई म्हणेल, ‘अरे, माझ्या लेकाच्या लेका’, पंगतीचं जेवण असेल तर ‘सैपाक सांगीतला’, पाऊस येत आहे हे वाक्य ‘पानी येऊन राह्य़ला’ असं म्हणतात. एखाद्याला काम सांगताना, ‘हा काम करू घेजो’, ‘पानी भरून ठेवजो’ असं बोललं जातं. स्त्री असेल तर म्हणेल, ‘आता मी सैपाक करतो’ ‘मी बजारात जातो’. ‘गेला होता’साठी ‘गेल्ता’, ‘आला होता’साठी ‘आल्ता’ (जोडाक्षर) असं बोललं जातं. यावरून झाडीपट्टी व वऱ्हाडातील बोलीभाषेत बरंच साम्य असल्याचं दिसतं.
गाडीचा उच्चार ‘गाळी’ आणि पळालीचा ‘पराली’ असा आहे. म्हणजे बोलताना ‘ड’ ऐवजी ‘ळ’ आणि ‘क’ ऐवजी ‘र’ वापरले जाते. ग्रामीण भागात गोंदिया गावाचा उच्चार ‘गोंदय़ा’ असा आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर जुनं प्रचलित पण विस्मरणात गेलेलं गाणं असं आहे-
गाळी आली, गाळी आली गोंदय़ाची
बायको पराली, चिंध्याची।
झाडीपट्टीतीलच मध्यप्रदेशातील डोंगरगड येथे भाविकांचे महादेवाच्या दर्शनासाठी गोंदिया- भंडारा जिल्ह्य़ातून भक्तांचे जत्थेचे जत्थे जातात. त्यास ‘महादेवाचा पोहा’ म्हणतात. तेथे उंच पर्वतशिखरावर जुन्या काळातील महादेवाचं मंदिर आहे. हळद-गुलाल चेहऱ्याला फासलेले भाविक दर्शनाकरिता जाताना सामूहिकरित्या जल्लोष करतात.
गडावर गड रेऽ अन्ं या देवाऽ
महादेवाले जातो गाऽ अन् या संभू राज्याऽऽ
एक नमन कवडा, पारबती, हर हर महादेवऽऽ
शेवटी असा जयघोष करतात. ‘एक नमन कवडा’ म्हणजे एक कडवं झालं. पार्वती-महादेव या दोघांना नमन असो, बहुतेक असा भावार्थ असावा. येथे ‘नमन’ शब्द प्रमाण मराठीतून आला आहे.
नुकतीच दिवाळी सरल्यावर गावोगावी गॅसबत्तीच्या उजेडात येथील लोककला दंडार कोंबडा आरवते तोपर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत असायची. पौराणिक पात्र विस्कटलेल्या भरजरी रेशमी वेशभूषेत असायचे. तेथील एक गाणं अजून आठवतं.
टार बाई टुऱ्याची डंडार,
कुकडू जाईल पल्याड..
‘टार’ म्हणजे ‘टाळ’, ‘टुऱ्या’ म्हणजे ‘दांडय़ा’, ‘कुकडू’ म्हणजे ‘कोंबडी’, ‘पल्याड’ म्हणजे ‘पलीकडे’. गाण्याचा भावार्थ असा- ही आहे टाळ आणि दांडय़ाची दंडार, हा नाद ऐकून कोंबडी पलीकडे होईल पसार!
विदर्भात पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. म्हणून बैलांची पूजा करतात. त्या दिवशी बैल शर्यतीत पळतात. बैलांचा सण असला तरी ‘गाय खेलली’ (खेळली) किंवा ‘खेलेल’ (म्हणजे खेळणार) असं म्हणतात.
तसेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यातून ‘धसाडी’ (उंचपुरी धिप्पाड) मारबतची (एक राक्षसीण) गावातील रोगराई व इतर अनिष्ट काढण्याच्या समजुतीने, वाजतगाजत मिरवणूक काढतात. त्यावेळेस लोक आरोळी ठोकतात-
इडा पीडा राई रोग खासी खोकला,
घेऊन जाय वोऽ मारबतऽऽ
यात इडा (केलेली करणी), पीडा (ताप), राईरोग (रोगराई), खासी (खोकला) अशा हिंदी मिश्रित शब्दांचा समावेश आहे.
होळीच्या काही दिवस अगोदर चांदण्या रात्री हातात हात घट्ट गुंफून दोन मुली चक्राकार फुगडी खेळतात. कोकणातील झिम्मा झिम्मा फुगडीशी याचं साम्य आहे. फुगडी जेव्हा ‘हार-जीत’च्या चरमसीमेवर येते, तेव्हा खेळताना दमलेल्या स्वरात समोरच्या मुलीला दुसरी मुलगी म्हणते-
हारलीस गे हारलीस गे,
भावाले नवरा केलीस गे।
येथे हार झाली, त्यासाठी ‘हारलीस’ असा शब्द आहे. केलीस, गेलीस, बोललीस असे बोलले जाते. ‘गे’ हा शब्द ‘ग’ (म्हणजे अगं) साठी वापरला जातो. संतवाङ्मयातसुद्धा ‘गे’ हा शब्द वारंवार येतो. ‘भावाला’ या शब्दात प्रमाण मराठीतल्या शब्दाऐवजी ‘भावाले’ असे बोलले जाते. या फुगडीच्या खेळात समोरच्या मुलीला हरवण्याकरिता हा प्रेमाने डिवचण्याचा प्रकार आहे. शेवटी एकीचा तोल सुटतो अन् दमल्याभागल्यावर खेळ संपतो.  

Boli bhasha in maharashtra - Vasai Bolibhasha

bolibhasha
boli bhasha in maharashtra
boli bhasha in marathi
maharashtratil boli bhasha

वसईतील बोलीभाषा

वसईमधील धर्मातरित लोकांनी कधीच आपल्या मूळ भाषेचा त्याग केला नाही.
भाषा हे अभिव्यक्त होण्याचे एक साधन आहे. भाषा या माध्यमामध्ये ज्ञान-माहितीचे भांडार, विचार-भावना, व्यवहार इत्यादी अनेक गोष्टी आहेत. यामुळेच भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. असे म्हटले जाते की, प्रत्येक १२ कोसांवर भाषा बदलते आणि दर १२ वर्षांनी परिस्थितीनुरूप त्या भाषेत बदल होत जातात. भारतामध्ये साधारणत: हजारहून अधिक बोलीभाषा प्रत्यक्ष वापरात आहेत. वसईमधील स्थानिक लोक दैनंदिन जीवनात १५ ते १६ बोलीभाषांचा वापर करतात.
कादोडी (कुपारी समाजाची बोलीभाषा), वाडवळी, कोकणी, आगरी, कोळी, रानकर कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, वारली (आदिवासी भाषा) इत्यादी वसईमधील प्रमुख बोलीभाषा आहेत. याच भाषा प्रत्येक गावात समाजपरत्वे आपल्याला वेगवेगळ्या ऐकायला मिळतात. भाषा सारखीच पण शब्द वेगळे, उच्चार वेगळे, लय-गती यांत फरक आढळतो. भाषा बदलली म्हणून ती वेगळी आहे, असे गणले जाते, यामुळेच बोलीभाषांच्या संख्येत वाढ झालेली आहे.
पूर्वीच्या काळी दळणवळण, व्यापार हे समुद्रामार्गे होत असे. त्या काळात उत्तर कोकणातील वसई, सोपारा ही महत्त्वाची बंदरे होती. म्हणूनच या भागात विविध प्रांतांतील लोकांची ये-जा होत असे. त्यामुळे या भाषेत गुजराती, मारवाडी, पारसी, इराणी, कानडी, ऊर्दू, अरबी आणि पोर्तुगीज इत्यादी भाषांचा प्रभाव दिसतो. या भाषांतील काही शब्द येथील स्थानिक लोक त्यांच्या बोलीभाषेत सहज वापरतात.


वसईमधील धर्मातरित लोकांनी कधीच आपल्या मूळ भाषेचा त्याग केला नाही. त्यामुळे येथील मूळ ख्रिस्तींची म्हणजेच सामवेदी (कुपारी) समाजाची कादोडी भाषा, सोमवंशी (वाडवळ) समाजाची वाडवळी भाषा, ईस्ट इंडियन (ओळकर/ ओलकर) समाजाची ईस्ट इंडियन भाषा आणि कोळी (इतर मच्छीमार) समाजाची कोळी भाषा आजही त्यांनी टिकवून ठेवली आहे. या ख्रिस्ती समाजांच्या बोलीत पोर्तुगीज आणि लॅटिन शब्दांचा वापर अधिक आहे. नंतरच्या काळात धर्मातरित झालेल्या समाज त्यांची मूळ भाषाच बोलत राहिले. या १०० वर्षांत आदिवासी समाजानेही धर्मातर केले, त्यांनीही त्यांची आदिवासी भाषा टिकवून ठेवली आहे.
मराठीमध्ये आपण इकडे-तिकडे हा शब्द वापरतो त्यासाठी येथील बोलीमधील कादोडी भाषेत अडे-तडे (अडॅ-तडॅ), वाडवळी भाषेत अटे-तटे, ईस्ट इंडियन भाषेत अंवार-तंवार तर कोळी भाषेत अईला-तईला असे म्हणतात. त्याचबरोबर अंयला-तंयला, अंय-तंय, अंयशी-तंयशी, अंथ-तंथ, अय-तय इत्यादी हे शब्ददेखील वसईच्या विविध भागांत वापरले जातात.
या बोलीभाषांतील अनेक म्हणी प्रसिद्ध आहेत. म्हण ही अलंकारिक असल्यामुळे भाषेची शोभा तर वाढवते आणि त्याचबरोबर सूचक अर्थही दर्शविते. कादोडी भाषेमधील, ‘सात दऱ्यो पॉवलॉ; वेहीत येऑन बुडलॉ’ याला मराठीत ‘सात दऱ्या पोहून आला, वेशीत येऊन बुडाला’ असे म्हणतात. याचा अर्थ, मोठय़ा दिव्यातून पार झाला, पण थोडक्यासाठी फसला. वाडवळी भाषेमधील, ‘मायेरशी पेज (कणेर) प्यावी न धनाहारकी हंगावी’ याला मराठीमध्ये ‘माहेरची पेज प्यावी अन् मिष्ठान्न खाल्ल्याचे सांगावे’ असे म्हणता येईल. म्हणजेच याचा अर्थ घरच्या परिस्थितीचे प्रदर्शन न करणे. ईस्ट इंडियन भाषेमधील, ‘बेंडय़ान वय केली न वाऱ्यावर गेली’ यास मराठीमध्ये ‘आंधळ्याने कुंपण केले अन् वाऱ्यावर गेले’ असे म्हणतात. याचाच अर्थ, अमाप कष्ट करून मिळवले, पण निसर्गापत्तीने नष्ट झाले. वारली भाषेमध्ये, ‘आंबा पडल, चिंच झेलल; चिंच पडल, आंबा झेलल’ यास मराठीमध्ये ‘आंबा पडेल, चिंच झेलेल; चिंच पडेल, आंबा झेलेल’ असे म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ आयुष्याच्या वाटेवर एकमेकांस साहाय्य करणे.
पूर्वी या बोलीभाषांचे लिखित-मुद्रित स्वरूप उपलब्ध नव्हते. कालांतराने चक्र बदलले. ९० च्या दशकापासून येथील स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन आपली भाषा टिकवण्यासाठी आणि ती अधिक समृद्ध करण्यासाठी पावले उचलली. आपल्या मातृभाषेत लेखन सुरू केले, विशेषत: कदोडी आणि वाडवळी बोलीभाषेतील लिखित साहित्य आज उपलब्ध आहे. तर कादोडी भाषेचे व्याकरणही बनवले आहे. यात ‘अ’, ‘आ’, ‘इ’, ‘ई’, ‘उ’, ‘ऊ’, ‘एॅ’, ‘अई-आई’, ‘ओ’, ‘ऑ’, ‘अऊ’, ‘अं, ‘अ:’ (ऐ, औ वापरले जात नाहीत) असे १४ स्वर आणि ३२ व्यंजने (मराठीप्रमाणेच सर्व व्यंजने असून च, छ, ण, ष वापरले जात नाहीत.) आहेत.


या बोलीभाषांचा गौरव म्हणजे, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून शालेय (मराठीच्या पाठय़पुस्तकात) तसेच महाविद्यालयीन (बी.ए., एम.ए.) अभ्यासक्रमात अल्पसंख्याकांचे साहित्य म्हणून वसई-पालघर भागातील वाडवळी, कादोडी, आगरी इत्यादी बोलीभाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, जॉर्ज लोपीस, रिचर्ड नुनीस, स्टॅन्ली गोन्सालवीस, स्टीफन एम. परेरा, दीपक मच्याडो, रेमंड मच्याडो, धोंडू पेडणेकर, स्मिता पाटील आणि सिरील मिनेजीस या साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे. पुढच्या अनेक पिढय़ा या साहित्याचा, या बोलीभाषेचा अभ्यास करणार ही वसईकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
या बोलीभाषांसह मराठी भाषाही येथे पूर्वीपासून बोलली जाते. अनेक लोकांचे मराठी साहित्य प्रकाशित झालेले आहे. सर्व बोलीभाषा या मराठी भाषेच्या भगिनी आहेत. वैश्वीकरणानंतरच्या काळात या भागातील लोकदेखील उपजीविकेची भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजीचा वापर मोठय़ा प्रमाणात करू लागले. त्यामुळे इंग्रजी शब्दही या बोलीत आले आहेत.
‘‘बोलीभाषा कधीच मृत पावणार नाही. जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत ती राहणार. तिचा वापर मात्र कमी होऊ  शकतो. भाषेचे मूळ साहित्य अबाधित राहून, ती रूपांतरित होत जाते,’’ असे फादर फ्रान्सिस कोरिया सांगतात.

bolibhasha
boli bhasha in maharashtra
boli bhasha in marathi
maharashtratil boli bhasha