Information of Sindhudurg fort in Marathi

किल्ले सिंधुदुर्ग (सौजन्य : एमटीडीसी)
राजे कोकण दौऱ्यावर होते. मालवण किनापट्टीवरून समुद्रात काही अंतरावर राजांना एक काळा ठिपका सतत खुणावत होता. जवळच असलेल्या एका कोळी बांधवाला बोलावण्यात आले. स्वतः तानाजी बोलावण्यास गेले. तानाजी आणि कोळी राजांसमोर दाखल झाले. साक्षात छत्रपती डोळ्यासमोर पाहिल्यानंतर सावजी कोळी आनंदला. त्या खुणावणाऱ्या ठिपक्याकडे बोट दाखवत राजांनी, ‘ते काय आहे?’ असा प्रश्न केला. कुरटे बेट! कोळी उत्तरला.

राजांचे डोळे चकाकले. मनसुबा ठरला. एका विलक्षण आकृतीने डोळ्यासमोर रुंजी घालण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी तानाजी, गंगाजी, मानाजी आदींनीं कुरटे बेट पाहून आले. आपल्या भाषेत रेकी केली. बेटाची माहिती घेण्यास गेलेल्यांनी सकारात्मक माहिती आणावी असेच राजांना वाटत होते. तसेच झाले. उलट मजबूत खडक आहे यासोबत खडकावर गोडं पाणी असल्याची शुभवार्ता त्यांनी सांगितले. इथेच आपल्या मनातला जंजिरा उभा करायचा हे राजांनी कधीच ठरवलं होतं. महाराजांनी जातीनं कुरटे बेटावर जायचं ठरवलं. महाराजांच्या पावलानं आणि त्यांच्या डोक्यात उठलेल्या विचारांच्या माजलेल्या काहुरानं या बेटाचं सोनं होणार होतं.

राजांनी चौफेर नजर फिरवीत म्हणाले,

‘चौऱ्यांशी बंदरी ऐसी जागा नाही. या बेटाच्या रूपाने सिद्दीची मिजास उतरेल. आमची गलबते येथे सुरक्षित राहतील.’ (संदर्भ : श्रीमान योगी)
मुहूर्ताचा नारळ फुटला, पण..

बेटाभोवती बांधकामासाठी टाकण्यात येणारा भराव वारंवार वाहून जात होता. अभियंत्यांपासून मजूर थकले. बांधकाम सामान असे वाहून जाणे परवडणारे नव्हते. महाराजांपर्यंत ही वार्ता पोहोचली. किल्लेबांधणीची सुरुवात अशा पद्धतीने होणे महाराजांना रुचणारे नव्हते. प्रयत्न सुरूच होते.



छत्रपतींच्या मनात आई भवानीचा पुकारा सुरु होता.
एकेरात्री महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नात साक्षात शिव! ‘या कुरटे बेटापासून ८ किमी अंतरावर माझी स्वयंभू पिंड नजरेस पडेल. तिचा जीर्णोद्धार करा. कामात यश येईल’ अशा सूचना एकामागोमाग एक स्वप्नातच कानावर थडकल्या.’ राजांना खाडकन जाग आली.

दुसऱ्या दिवशी महाराजांनी आपल्या सेवकांना शिवशंकरांनी सांगितलेल्या दिशेने पाठवले. मालवण बंदरापासून आठ किमी अंतरावर कांदळगाव या गावी (दलदलीच्या भागात) सेवकांना स्वयंभू पिंड सापडली. महाराजांनी जातीने येऊन या पिंडीचा जीर्णोद्धार केला. घुमट बसवून दिली. आज या मंदिराचा कायापालट झाला आहे. मात्र शिवकालीन घुमट आजही पाहायला मिळते.



श्री देव रामेश्वर, कांदळगाव (फोटो : तपस्वी राणे)


श्रीदेव रामेश्वर देवस्थान, कांदळगाव (सौजन्य : आंतरजाल)
याच घुमटीसमोर महाराजांनी स्वतः एका वडाच्या रोपट्याचे रोपण केले. आजही पावणेचारशे वर्षानंतर हा वड राजांच्या गडकिल्ल्यांप्रमाणे ताठ उभा आहे. हाच वड शिवाजीचा वड म्हणून ओळखला जातो. या स्वयंभू पिंडीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणीला पुन्हा सुरुवात झाली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी मात्र पाया जागेवर नीट रुतला. ५ खंडी शिशाचे रस ओतून पायाचे दगड बसविले गेले. खासे चिरे फोंडा आंबोली घाटातून आणण्यात आले. महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याचा जंजिरा (किल्ले सिंधुदुर्ग) आकार घेऊ लागला.

चार किमी परिघात पसरलेली ही शिवलंका उभारण्यासाठी पाचशे पाथरवट, दोनशे लोहार व कामाठी, कोळी वगैरे तीन हजार मजूर सतत ३ वर्ष अहोरात्र झटत होते. तब्बल १ कोटी होन खर्च करत २९ मार्च १६६७ रोजी किल्ले सिंधुदुर्ग उभा राहिला.

तो भुयारी मार्ग..

सिंधुदुर्ग किल्ल्यावर गोडं पाणी सापडलं होतं. भर खाऱ्या समुद्रात गोड्या पाण्याचे साठे म्हणजे देवाक काळजी! साक्षात रामेश्वराने कौल दिला होता. किल्ल्याचे काम सुरु झाल्यानंतर तिथे विहिरी बांधण्यात आल्या. साखरबाव, दहीबाव, दूधबाव!



किल्ल्यावरील विहिरी (सौजन्य : सुभाष डी प्रॉडक्शन)
त्या विहिरी नव्हत्याच. राजांच्या सुरक्षेसाठी हिरोजी इटळकरांनी, राजांच्याच आदेशाने त्यांच्या आयुष्याची लकेर लांबलचक खेचून घेतली होती. अनेकांना या विहिरीतून भुयारी मार्ग खोदण्यात आल्याची माहिती नाही. ज्यांना त्याबाबत माहिती आहे, त्यांना तो भुयारी मार्ग कुठे जातो याबाबत माहिती नाही.



विहिरीच्या आतील भाग (सौजन्य : सुभाष डी प्रॉडक्शन)
किल्ला बांधला म्हणजे गोष्टी संपत नसतात. केवळ किल्ला बांधणारा राजा, त्या किल्ल्यातून भविष्यातील धोक्यांचा अंदाज घेत चोरवाटा तयार करून घेणारा जाणता राजा… राजांच्या नजरेतून मालवणची कातळ जमीन सुटली नव्हती. किल्ला आकार घेताना अनेकांचे डोळे दिपवत होता. मात्र त्याचक्षणी शिवलंकेच्या खालून, भर समुद्राच्या खालून भुयारी मार्ग खोदण्यात येत होता. आम्ही आता कुठे अंडरग्राउंड मेट्रो बांधतोय. राजांनी तब्बल आठ किमीचा भुयारी मार्ग बांधला.

किल्ल्यावरील विहिरीतून सुरु झालेला मार्ग मालवणपासून आचऱ्याकडे जाताना ७.५ किमी अंतरावर ओझर या स्थानावर बाहेर पडला.



या चिंचोळ्या वाटेने ब्रम्हानंद स्वामींच्या समाधीकडे जावे लागते. इथेच आहे ते शिवकालीन गुहा (फोटो : रुपेश राणे)


आजही ती गुहा अस्तित्वात आहे. आज या ठिकाणी प.पु. ब्रम्हानंदस्वामींची समाधी आहे.



प.पु. ब्रम्हानंदस्वामींची समाधी (फोटो : रुपेश राणे)
एका बाजूला लोकवस्ती असताना हे स्थान मात्र दाट जंगलात, झाडाझुडपात आहे. काहीवेळा येथे व्याघ्रराज दर्शन देतात. बरं! राजांनी जीर्णोद्धार केलेली स्वयंभू पिंड या स्थानापासून अवघ्या १ किमी अंतरावर.. सोप्या भाषेत, कांदळगावाच्या वेशीवरच हे ओझर स्थान आहे.



शिवकालीन गुहा (फोटो : रुपेश राणे)
काही जिज्ञासूंनी काही वर्षांपूर्वी या गुहेतून जाण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या वाटेवर त्यांना दोन वाटा सापडल्या. मात्र त्या बुजलेल्या होत्या. एक वाट सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी होती. मग दुसरी? अधिक माहिती घेतल्यानंतर कळले की ही वाट मसुरे गावातील भगवंतगडाकडे जाते… धन्य तो राजा..

– शहाणो चाकरमानी

कसे जाल ?

तुमचे स्वतःचे वाहन असल्यास मालवणवरून आचराच्या दिशेने प्रवास सुरु करावा. कोळंब गावाच्या पुढे एक तिठा लागतो. याच तिठ्यावर (आचऱ्याच्या दिशेने) डाव्या बाजूस हे ओझरस्थान नजरेस पडते. तिथून पुढे कांदळगाव येथे जायचे असल्यास, मालवण-आचरा महामार्गावर ओझरस्थानासमोरच तिठ्यावरील एक मार्ग मारुती घाटीने मसुरे गावाच्या (आंगणेवाडीच्या) दिशेने जातो. त्याच मार्गाने पुढे गेल्यानंतर कांदळगावचे श्री रामेश्वर देवस्थान लागते. याच ठिकाणी तुम्हाला छत्रपतींनी लावलेला वड (शिवाजीचा वड) पाहायला मिळतो.

No comments:

Post a Comment