Poem on Father in Marathi



तो एक बाप असतो...

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

========================
=========================

तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
............... ............... ...तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
............... ............... ......तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून,तुम
्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
............... ............... ......तो बाप असतो
lovemarriage करायला कोणी निघाल
तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप
ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस
ऐकल्यावर खूप रडतो
............... .तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी,धायमोकळून
रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो!!!
=====================
=====================

वडिलांवर प्रेम असेल ना ,तर नक्की वाचा!!!
______________________________
बाप

मी खूप जणांना पहिलयं आपल्या आईविषयी लिहिताना.आईविषयी भाषण करताना.आईविषयी निबंध लिहिताना.आईविषयी गाणे बोलताना.मुलांच्या मनात नेहमी आईच असते वो,व्हाट्सअप्प ला स्टेटसजरी पाहिलं तरी ते आईचं असतं हो...पण त्या दिवसरात्र काम करून आपलं कुटुंब चालवणार्या बापाविषयी खूप जणांना शिव्या देताना ऐकलंय.. समोर नाही मित्रात..बाप जरी घरात आला की लगेच घरात भयानक शांतता..कारण काय बाप रागावतो.. एवढंच दुसर काहीच नाही..आणि बाप रागावतो कश्यासाठी तर त्या पोराच्या भल्यासाठीच ! पण ते पोरग कधी बापाला समजू शकत नाही..बाप म्हणजे बापाचं असतो..या बापालाच तुमच्या भविष्यासाठी या भोळ्या शंकरवरून हिटलर बनाव लागत..कारण त्याच्यात त्याच्या पोराचं हित गुंतलेलं असतं.. म्हणतात बाप मारतो.बाप ओरडतो.बाप शिव्या देतो.बाप काय काय बोलतो...पण मित्रांनो, तुमच्या जन्मापासून जे पण करत असतो ना ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच करत असतो..कारण तो बाप असतो..बाप म्हणजे बापाचं असतो ..त्याला दुसरी व्याख्या नसते..आपल्या पायात फाटकी कातडी चप्पल वापरून स्वतःच्या मुलाला नायकीचे शूज घेऊन देत असतो ना,तो बाप असतो. जो स्वतः तो हजार-बाराशेचा डबा फोन वापरतो,पण मुलाचं कॉलेज सुरू झाल्यावर त्याला पहिल्याच दिवशी अँड्रॉइड चा दहा-बारा हजाराचा मोबाईल घेऊन देतो ना तो बाप असतो.दहा रुपयांचा वडापाव घेण्यासाठी दोन-तीन वेळा विचार करणारा तो बापचं असतो,पण मुलाच्या हितासाठी कशातच काटकसर करत नाही..त्याच्या शिक्षणासाठी चांगला क्लास लावतो,चांगले शिक्षण देतो..त्याला चांगल्या कॉलेज मध्ये घालतो..नको ती नको कामे करतो ,फक्त आपल्या पोराच्या हितासाठी.पण हीच पोर पुढं मित्रांत बाप काही बोला किंवा रागावला तर त्याची चेष्टा करतानी दिसून येतात..त्याला आर तूर करत असतात..के काय बोलत असतात..सगळेच नव्हे तर काही..काय माहीत ते बापाबद्दल काय विचार करत असतात..माझी मम्मी खूप चांगली,पप्पा नाहीत चांगले..हे असं खूप जणांना बोलताना ऐकलंय..बापाची किंमत काही जणांना तेव्हाच समजते ज्या वेळेस बाप नसतो,तो देवाघरी निघून जातो.बापाची किंमत बघायची असेल ना तर ज्याचा बाप नाही त्याच्याकडे बघा..ज्याच्या घरात बाप नसतो..त्याला ऍडमिशन घ्यायला एकटाच जावं लागतं..त्याच्यासोबत बाप नसतो..या जगात सगळं भेटत पण बाप कधी भेटत नसतो..आयुष्यात दुसरी संधी मिळते.दुसरी बायको मिळते.दुसरी प्रेयसी मिळते..पण एकदा टिळाआड गेलेला बाप परत येत नसतो..बापाची किंमत त्यादिवशी समजते ज्या दिवशी ते घरात नसतात किंवा बाहेरगावी गेलेले असतात..तोच घराचा कर्ता असतो.मित्रांनो, आयुष्यात त्या बापाला कधीच विसरू नका ज्यांनी सगळ्यांना विसरून तुम्हाला मोठं केलं..चांगल्या सोई-सुविधा दिल्या..शिक्षण दिल..बाप आपल्या हितासाठीच सांगत असतो..त्याच काही हित नसत..तो या जगाचा चांगला अनुभवी असतो.त्याने हे संपूर्ण जीवन जगलेले असते..त्याला वाटते आपण जे दिवस काढले,जे कष्ट केले तसे आपल्या मुलांनी करू नयेत असे वाटत असत.. त्याने आपल्यापेक्षा मोठया शिखरावर जावे असे त्याला नेहमी वाटत असते..मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा,,ते होते ना म्हणूनच तुम्ही या जगात आहात.. सगळ्यांना विसरलात तरी चालेल पण त्या बापाला कधीच विसरू नका..नेहमी त्याला आनंदी ठेवा..बापाची स्वप्ने पूर्ण करा..तुम्हाला या जीवनात कधीच काहीच कमी पडणार नाही..!!!
मित्रांनो,मनापासून वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!

==================
==================

कोणीतरी लिहिलेली कविता आज सापडली ...खूप आवडते म्हणून शेअर करीत आहे

बाप ..........
आई घराचं मंगल्य असते, तर बाप घराचं
अस्तित्व असतो. पण घराच्या या
अस्तित्वाला खारंच आम्ही कधी
समजून घेतलेल आहे क? वडिलांना महत्त्व
असूनही त्यांच्याविषयी जास्त
लिहीलं जात नाही; बोललं जात
नाही. कोनताही व्याख्याता
आईविषयी बोलत राहतो. संत
महात्म्यांनी आईचच महत्व सांगीतलेल
आहे, देवधीकांनी आईचेच ग़ायले
आहेत.लेखकांनी, कवींनी आईचं
तोडंभरुन कौतुक केलं आहे. चांगल्या
गोष्टींना आईचीच उपमा दिली
जाते, पण बापाविषयी कुठेच फारसं
बोललं जात नाही. काहीं लोकांनी
बाप रेखाटला पण तोही तापट,
व्यसनी, मारझोड करनाराच.
समाजात एक दोन टक्के असे बाप
असतीलही पण चांगल्या
वडिलांनबद्दल काय?
आईकडे अक्ष्रुचे पाट असतात पण
बापाकडे संयमाचे घाट असतात. आई
रडून मोकळी होते, पण सांत्वन
वडिलांनाच करावं लागतं आणि
रडनाऱ्यापेक्षा सांत्वन
करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो
कारण ज्योतीपेष्या समईचं जास्त
तापते ना! पण क्ष्रेय नेहमीच
ज्योतीलाच मिलत राहतं! रोजच्या
जेवनाची सोय करनारी आई आमच्या
लक्षात राहते पण आयुष्याच्या
शिदोरीची सोय करनारा बाप
आम्ही सहज विसरुन जातो.
सर्वांसंमोर आई मोकलेपणाने रडू शकते,
पण रात्रि उशित तोंड खुपसून
मुसमुसतो तो बाप असतो. आई रडते, पण
वडिलांना रडता येत नाही.
स्वतःच्या बाप वारला तरीही
त्याला रडता येत नाही, कारण
छोट्या भावंडाना जपायचं असत. आई
गेली तरीही रडता येत नाही, कारण
बहिनींचा आधार व्हायचं असतं.
पत्नी अर्ध्यावरच साथ सोडुन गेली
तर पोरांसाठी अक्ष्रुंना आंवर
घालावा लागतो.
जिजाबाईनीं शिवाजी घडवीला
असं अवश्यं म्हनावं पण त्याचवेळी
शहाजी राजांची ओटाताण सुद्धा
ध्यानात घ्यावी. देवकीचं यशोदेचं
कौतुक आवश्यं करावं पण पुरातून
पोराला डोक्यावर घेऊन जाणारा
वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम
हा कौसलेचा पुत्र अवश्य असेल पण पुत्र
विभोगने तडफडून मरण पावला तो
पिता दशरथ होता.
वडिलांनच्या टाचा झिजलेल्या
चपलांकडे बघितलं कि त्यांचे प्रेम
कळते. त्यांचे फाटके बनीयन बघीतले
कीं कळतं, " आमच्या नशिबाची भोकं
त्यांच्या बनीयनला पडलीत".
त्यांचा दाढी वाढलेला चेहरा
त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला
गाऊन घेतील, मुलाला शर्ट घेतील पण
स्वत: मात्र जुनी प्यांन्ट्च वापरतील.
मुलगा सलुनमध्ये वीस पंचवीस रुपये खर्च
करतो, मुलगी पार्लरमध्ये खर्च करते पण
त्याच घरतला बाप दाढीचा साबन
संपला म्हणून आंघोळीच्या साबनाने
दाढी करतो. बाप आजारी पडला
तरी लगेच दवाखान्यात जात नाही,
तो आजाराला घाबरत नाही पण
डाक्टर एखादा महीना आराम
करायला लावतील याची त्याला
भीती वाटते कारण पोरीचं लग्न,
पोराचं शिक्षण बाकी असतं, घरात
उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते
तरिही मुलाला मेडिकल,
इंजिनिअरींगला प्रवेश मिळऊन
दिला जातो, ओढातान सहन करुन
मुलाला दरमहीन्याला पैसे पाठवले
जातात. पण सर्वच नसली तरी काही
मुलं अशीही असतात की जे तखेला पैसे
येताच मित्रानां परमीट रुममध्ये
पार्ट्या देतात आणी ज्या बापानी
पैसे पाठवीले त्याच बापाची टिंगल
करतात. एकमेकांच्या बापाच्या
नावांनी एकमेकाला हाका
मारतात.
आई घराचं मंगल्य असते, तर बाप घराचं
अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे
त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही
बघु शकत नही. कारण घरातला कर्ता
जिवंत असतो, तो जरी कहीही करत
नसला तरीही तो त्या पदावर असतो
आणि घरच्यांच कर्म बघत असतो,
साभाळत असतो.
कोण्त्याही परीक्षेचा निकाल
लगलयावर आई जवळची वाटते कारण
ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण
गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणनारा
बाप कोनाच्याच लक्षात राहत
नाही. आजारातील आईची माया
खुप आठ्वते पण हॉस्पिट्लच्या
आवारात आणि औषधीच्यां
दुकानात अस्वस्थपणे वावरणारया
बापाची कोनीही दखल घेत नाही.
चट्का बसला, ठेच लगली, फटका
बसला तर "आई ग! " हा शब्द बाहेर
पडतो, पण रस्ता पार करतांना
एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा "बाप रे!" हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आईचालते पण
मोठ्मोठी वादळ पेलताना बापच
आठवतो. काय पट्तय ना?

==================
==================

"बाप"

तो बाप असतो...

तो बाप असतो,
एका हाकेसाठी आसूसलेला असतो,
कुटुंब जपण्याच्या ध्यासात,
त्याची अर्धी राहिलेली स्वप्न कधीही शब्दातून मांडत नसतो.

एकच विचार लेकरांच्या भविष्याचा,
अन, एकच ध्यास त्यांच्या स्थैर्याचा,
तोच घेऊन तो जगत असतो,
त्याला हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी राहिल्या तरी चालेल,
पणं, लेकरां साठी तो कायम झटतं असतो.

कर्ज काढून कधी घर बांधत असतो तर,
कर्ज काढून कधी लेकरांना शिकवत असतो,
कर्ज काढून कधी तरी पत्नीला ही चार दोन दागिने घेत असतो.
पण, कर्ज काढून कधीही स्वतःला किमान एक सदराही घेत नसतो.

हिशोबाच्या वह्या रोज घेऊन तासन तास बघत असतो,
अन त्यातली गोळाबेरीज करता करता स्वतःचेच स्वत्व विसरून जात असतो.

वाहाण पायातली फाटली तरी तीच गोड मानून तो वावरत असतो,
पण तीच वाहाण मुलाच्या पायात बसता त्याला मात्र नविन घेऊन देत असतो.
स्वार्थ हा शब्दच ज्याच्या कोषात नसतो,
देत देत देत रहाणे हाच भाव त्याच्या मनी असतो.

तो बाप असतो, एका हाकेसाठी आसूसलेला असतो.

त्याच्या हर एक कृतीतून तो शिकवत असतो,
कधी अबोल्यातून तर कधी रागवून परिस्थीती कशी लढवायची हेच सांगत असतो.

आई म्हणजे वसुधा असते तर बाप म्हणजे अमर्याद आकाश असतो,
ह्या दोहों शिवाय मनुष्य जीवनात उभाच राहू शकत नसतो.

तो एकवेळ जत्रेत फुगे घेत नसतो,
पण दरवर्षीच्या लेकराच्याच वाढदिवसाला एक नविन बचत पॉलिसी काढत असतो,
वर्तमानातील क्षणिक आनंदा पेक्षा, भविष्यातल्या चिरंतन सुखाचाच कायम विचार करत असतो.

छंद हा कितीही चांगला असला,
तरी तो पोटाचा प्रश्न सोडवत नसतो,
मनास कितीही समाधान देत असला तरी,
भविष्याची शाश्वत शाश्वती देत नसतो,
त्यासाठी नोकरी धंद्या शिवाय पर्याय नसतो,
छंदात मन रिजवून आर्थिक स्थैर्यात अडकण्या पेक्षा
नोकरी/धंद्यात मन रुजवून
भविष्य सुकर करायला तो वारंवार सांगत असतो.

सचोटी आणि नियामितपणा हाच आयुष्याचा पाया असतो,
ह्या दोनच उक्तिं वर खरे तर हा देह उभा असतो,
ह्याच गोष्टी अंगी बाळगल्या तरीही आयुष्याच्या प्रवास खुप सुखकर होत असतो.

अखेर,

लक्षावधी लोकांना जरी दिसत असली पांडुरंगा मध्ये माऊली,
तरी आमच्या साठी तो लेकुरवाळा बापच असतो.
बेधुंद पणे फिरणाऱ्या लेकरांसाठी माथ्यावरचं छत असतो.
पाऊले डगमगली जरी, तरी, भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच कायम तो वदत असतो.
==================
=====================

बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला,
हाडांची कडे करून,
आधार देतो मनामनाला...!!!

~~~वडिल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा~~~
============================
======================
बाप मात्र स्वतःसाठी कधी जगलाच नाही...

वडिलांची ओळख काहीजण हिटलर तर काहीजण बुलडाॅग करतात,
काहीजणांना तर वडिल दगडासारखा कणखर वाटतो,
पण दगडासारखा कणखर वाटणारा हाच आपला बाप,
स्वतःसाठी कधी क्षणभर तरी जगायचा का हे मात्र विसरतात...

आईच्या डोळ्यातल्या आश्रुंसाठी बाबा जगायचा,
मुलांच्या असणार्‍या काळजीपोटी बाबा जगायचा,
कुटुंबाच्या सुखाःसाठी, प्रेमापोटी बाबा जगायचा,
पण स्वतःसाठी कधी क्षणभर जगलाच नाही बाबा...

मुलांच्या शालेय शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणारा बाबा,
मुलांना उच्चशिक्षीत करण्याची जिद्द मनात ठेवणारा बाबा,
मुलांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा बाबा,
मात्र स्वतःसाठी कधी जगलाच नाही...

मुलांना खांद्यावर घेऊन सारं जग दाखवत फिरवणारा बाबा,
तर मुलांना पाठीवर घेऊन घोडागाडी होऊन मिरवणारा बाबा,
मुलांना जगाची एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा बाबा,
स्वतःसाठी कधी क्षणभर आनंदाने जगलाच नाही...

मुलगा आजारी पडला, मुलगी आजारी पडली,
त्यामुळे दिवस रात्र काळजी करणारी आई जाणवते आपल्याला,
पण त्याच काळजीपोटी दिवस-रात्र आतल्या-आत
धुमसत राहणारा, घुसमटत राहणारा बाबा कधीच नाही जाणवला आपल्याला,
खरंच आपल्या काळजीपोटी आश्रु ढाळणारा बाप स्वतःसाठी कधी जगलाच नाही...

मुलीच्या लग्नात सासरच्यांच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करणारा बाबा,
माझ्या लेकीला फुलासारखं जपा म्हणून हक्काने सांगणारा बाबा,
लेकीला आपल्या कवेत घेऊन सासरी पाठवताना ढाय-मोकळून रडणारा बाबा,
मात्र स्वतःसाठी कधीच नाही जगायचा...

लग्न होऊन तीच्या सासरी गेलेल्या मुलीसाठी,
तीच्या आईच्या प्रेमाची ओढ नेहमीच जाणवत असे,
पण पाणावलेल्या डोळ्यातले अश्रू मुठीत धरून,
कर्जाचे हप्ते फेडणारा बाप आपल्याला कधीच कसा नाही जाणवायचा,
खरंच बाप मात्र स्वतःसाठी कधीच नाही जगायचा...

बाबा नेहमी कुठल्यातरी काळजीत असायचा,
कुठल्यातरी विचारात बाबा नेहमी हरवलेला दिसायचा,
मनाशी दडलेली सगळी काळजी दूर करून,
जेव्हा तो नव्या उमेदीने संकटांना सामोरे जायचा,
तेव्हा मात्र सारं भान विसरून तो पुन्हाः कामाला लागायचा,
पण तो बाप मात्र स्वतःसाठी कधीच नाही जगायचा....

कित्येक वर्ष प्रभू श्रीराम देखील,
पुत्रविचारांमुळे भावूक असायचे,
पुत्रविचारांमुळे भावुक झालेले प्रभू श्रीराम(एक वडिल),
मात्र स्वतःसाठी कधीच नाही जगायचे...

काय सांगावी एका बापाची महती,
जो स्वतःच्या सुखाःसाठी न जगता,
मुलांच्या भावी आयुष्यासाठी जगला,
तो बाप मात्र स्वतःसाठी कधीच नाही जगायचा...

तो फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठीच जगला...
===================
==================
खूप सुंदर लिहिले आहे ...😰...

बाप माझा कधी जगलाच नाही ...😰...

जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं,
बापाला वाटूनही झोपताना कधी कुशीत घेता आलं नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...

शाळेत पाठवून कर्तव्य केलं,
आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं,
कामाच्या ओझ्याखाली ईच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...

प्रत्येक आनंदाला आईचे हास्य पाहून हसलो आणि दुःखाला अश्रू पाहून रडलो,
पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला बाप मला कधी दिसला नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...

माझ्या आजारपणात आई कायम जवळ बसून रडत होती
तिला मी विसरू शकलो नाही,
पण बाहेर डॉक्टर ला भेटून उपचारासाठी खस्ता खाणारा बाप मला कधी दिसलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...

नोकरीसाठी आईने केलेली प्रार्थना बघून हळवा झालो,
पण बापाने चार ठिकाणी टाकलेल्या शब्दाची किंमत कधी कळलीच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...

लग्न लावून सुखाने संसार करा म्हणणाऱ्या आईचे प्रेम आटलेले कधीच जाणवले नाही,
पण डोळ्यात सुख आणि आनंदाच्या पाणावलेल्या कडा जपून
खर्चाचे हफ्ते भरणारा बाप कधी दिसलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...

मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी,
मृत्यू झाल्यावर अर्धी संपत्ती नावावर करून गेलेला बाप मला कधी कळलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही...

कोणी लिहले माहीत नाही
पण खूप अर्थपूर्ण लिहले आहे...

´*•.¸(*•.¸♥¸.•*´)¸.•*´
♥«•°माझे बाबा°•»♥
.¸.•*(¸.•*´♥`*•.¸)`*•.
┇┇┇┇
┇┇┇♡
┇┇♡
┇♡
====================
===================

 कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बापच असतो.संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बापच असतो.कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बापच असतो.
लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि
लेकीसाठी तळमळ असणारा बापच असतो.म्हणजे बघा लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बापाच लेकीचा सुखासाठी रोज मर -मर जगणारा बापच असतो.
आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बापच असतो.आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा बाबाच असतो.
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही.अर्ध्यात धागा तुटल्याची ती वेदना कोणीच समजू शकणार नाही.दिल्या घरी सुखी रहा म्हणताना " मनातून खचलेलाही बापच असतो.
असा हा बाप त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो.
आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते.लेकीचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तिच्या बाबांन वर असतो.
लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही.ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची राजकुमारीच असते ....

आईच गुणगाण सार जग करत म्हटलं आज लिहावं त्या बाप बद्दल जो आपल सर्वस्व मुलीचा जिवासाठी लावतो ..एक मी लिहलेली कविता सादर करतो आहे ...


कविता - - written by अनिकेत वाघमारे

आपण आयुष्यभर आईचं गुणगाण खुप करतो...
पण बिचारा बापाच धावपड करून रक्ताच पाणी करतो..............

संकट प्रसंगी बापच धावून येतो
आपण फक्त आई-आईच करत बसतो .............

आईकडे असते संस्कारची किल्ली
तर बाप असतो संयमाचा गुरुकिल्ल्ली.............

सदा आठवते जेवण बनवणारी प्रेमळ आई
पण त्याच शिदोरीची सोय हा बापच रोज पाही...........

काटकसर करुन खर्चाला देतो पौकेटमनी
स्वतःह मात्र वापरतो शर्ट-पॅन्ट जुनी रे जुनी...........

घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी
पण मुलांना घेतो नवी साडी, नवी गाडी.................

वयात आल्यावर मुल आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसते मुलांच शिक्षण....पोरीचे लग्न

जिवंतपणी पूर्ण करावी आई वडिलांची सर्व इच्छा
त्यांना समजुन घ्यावं....हीच शेवटची इच्छा ..............

- अनिकेत वाघमारे ✍️ ✍️

आजचा काळात मुलगी झाली की तिला " झाली पोर न जीवाला घोर " अस काही समजणारी लोक अजूनही आपल्या समाजात आहे.म्हणतात की फक्त मुलगा च वंशाचा दिवा लावू शकतो ...गर्भपात ...कन्याभ्रूण हत्या आजपण आपल्या समाजाला लागलेली कीड आहे.जे लोक मुला मुलीत फरक समजतात त्यांनी हा लेख एकदा जरुरू वाचावा .....

खर तर आयुष्य काय असते समजण्यासाठी
सर्वांना पोटी एक मुलगी जरूर असावी........

बापाला घास भरवण्यासाठी ...
रोज संध्याकाळी,दमलास का रे बाबा म्हणण्यासाठी...
लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी...
बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी...
रडू नको ना बाबा म्हणण्यासाठी...
शाळेत सोडायला तूच ये असं हट्ट धरण्यासाठी...
आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी ...
शेवटी .....
बापाला कन्यादानाचे सुख देण्यासाठी ...
पोटी एक मुलगी जरूर असावी...

कसा वाटला मित्रांनो माझा हा छोटासा लेख......?
खरं तर या विषयावर मी अजून खूप छोटा आहे,एखादया मुलीने हा लेख तिचा बाबांनसाठी जर लिहला असता तर मला खूप आनंद झाला असता.

जेव्हा एक बाप रडतो ......😭😭
=================
=================
पप्पा तुम्ही असता तर...
आईच्या डोळ्यांत आनंद पाहिला असता...
कुठलाही फॉर्म भरताना माझा हात थरथरला नसता...
बाळ! तू कुणाचा मुलगा असं कुणी विचारता जीभ अडखळली नसती...
पप्पा तुम्ही असता तर सावली परकी झाली नसती...!!!

पप्पा...!!! पाठीवरच्या शबासकीला मुकलो
कधी चुक झाली असेल तर त्या धारदार आवाजाला मुकलो...

लहानपण होतं कुठे...???
मला नाही माहित...

शाळेत जाताना,
त्या तुमच्या हातातल्या बोटाला मुकलो,
कधी लाडात अलोच असेल तर, तुमच्या त्या गोड-गोड पाप्याला मुकलो...

कसं वाढलो आम्ही...???
मला माहित नाही...
कसे होतात तुम्ही...???
मला आठवत नाही...

कधी कामावरून आला असाल तुम्ही...
तुम्ही आणलेला खाऊ नसेल मिळाला...
कधी माझ्याशी खेळताना...
बसायला तुमचा खांदा नाही मिळाला...

खरच पप्पा तुम्ही असता तर...
कुणी बापावरून बोलल्यावर
माझी मान खाली गेली नसती...
कुणी बाप-लेकांना भेटताना पाहिल्यावर
डोळ्यांतून अश्रुंची धार ओसरली नसती...

पप्पा.........जगलो
कारण आईला ताठ मानेनं जगवायचं होतं...
पप्पा.........जगलो
कारण तुमचं नाव राखायचं होतं...
पप्पा.........जगलो
कारण तुम्ही दिलेलं आयुष्य तुम्हालाच जगुन दाखवायचं होतं...
पप्पा.........जगलो
कारण त्या वेड्या ममतेच्या डोळ्यांत कधीतरी सुख पहायचं होतं...

पप्पा...पप्पा मला चॉकलेट आणा
पप्पा...पप्पा मला कपडे आणा
पप्पा...पप्पा मला फिरायला न्या
फिरता-फिरता पप्पा मला एक Ice-cream द्या

पप्पा...मला चॉकलेट नको
पप्पा...मला कपडे नको
पप्पा...मला फिरायला पण नाही जायचं
फिरता-फिरता Ice-cream पण नाही खायचं
पप्पा...मला हवे आहात फक्त तुम्ही...!!!

पप्पा तुम्ही असता तर...
एकदा तरी मला तुमच्यापशी हट्ट करता आला असता
रात्री तुमच्या कुशीत झोपण्याचा आनंद घेता आला असता

पप्पा...सगळे म्हणतात...
तुम्ही खुप चांगले होता
तुम्ही खुप हसरे होता

पप्पा...लहानपणी सगळे मला म्हणायचे, तुझे पप्पा देवाघरी गेले

पप्पा...तुम्ही अजुनही देवाघरीच आहात का हो?
कसं असतं हो देवाचं घर?

विचाराना त्या देवाला, का गेलात तुम्ही आम्हाला सोडून
जीवनाशी बांधलेली नाळ, अशी आर्ध्यावरच तोडून...

मी देवाघरी आल्यावर त्याला नक्की विचारीन...
कसं होतं तुमचं अस्तित्व मग मीही पाहीन...

पण, पप्पा...तरी मला एक प्रश्न पडतो...!!!
तुम्ही नक्की कसे होता...???

पप्पा...मी पास झालो, तुम्हाला कळलं का?
पप्पा...मी आजारी आहे, तुम्हाला कळलं का?

पप्पा तुम्ही असता तर...
आजारी असताना तुम्ही आणलेला बिस्कीटचा पुडा मिळाला असता
आईने कधी मारताच तुमचा आडोसा मिळाला असता

पप्पा...कधी चुकल्यावर मला शिक्षा करायला तुम्ही नव्हता
पप्पा...कधी खेळताना पडल्यावर, जखमेवर फुंकर घालायला तुम्ही नव्हता

पप्पा...तुम्हीच सांगाना...

एखाद्या चौकटीची एक बाजू तुटल्यावर किती पोकळी निर्माण होते...???

पप्पा...दादाचं लग्न झालं,
तुम्ही नव्हता...की होता...???
तुम्ही होता पप्पा...
म्हणूनच तर, पत्रिका वाटल्या गेल्या
म्हणूनच तर, पाऊस पण पडला
अन् म्हणूनच तर, त्या लग्नासाठी मांडव पण अपुरा पडला

पण मी...??? मी कुठे होतो पप्पा तेव्हा...???
मला नाही आठवत...
मला नाही आठवत...

माझ्याकडून काही चुकलं तर नाहीन् पप्पा...???

पण पप्पा...त्याच्या लग्नात तुम्ही असता तर...

पप्पा...आम्ही जगू
तुमचे संस्कार जपायचेत
पप्पा...आम्ही जगू
तुमचे विचार रूजवायचेत
पप्पा...आज मला तुमची गरज आहे...
पप्पा...मला नोकरी मिळालीय

पण...
तुमची शबासकी नाही मिळाली
तुम्ही खुश होऊन आणलेले पेढे
माझ्या चेहऱ्यावरून, केसांतून फिरवलेला हात
अन् मला मारलेली घट्ट मिठी...
द्याल का कधी मला...???

पप्पा...आईने घास भरवला,
पण, ठसका लागल्यावर पाणी द्यायला तुम्ही हवा होता...
पप्पा...आईने बोट धरून चालायला शिकवलं,
पण, खांद्यावर उचलून घ्यायला तुम्ही हवा होता...
पप्पा...दादाने सायकल शिकवली,
पण, तोल सावरायला तुम्ही हवा होता...
पप्पा...दादाने प्रेमाने समजावलं,
पण, कधी-कधी रागवायला तुम्ही हवा होता...

खरंच पप्पा तुम्ही असता तर...
पोरका असल्याची जाणीव झाली नसती
चालता-बोलता, ऊठता-बसता तुमची सारखी आठवण झाली नसती

पप्पा...आम्ही असं काय पाप केलं होतं की आमच्याच वाट्याला हे? का हो?

पप्पा...

करणार कशी मी कवीता तुमच्यावर,
तुम्ही त्यात मावणार नाही...
चार ओळीत सांगण्यासारखे शब्द,
आता सुचणार नाही...

सोनचाफ्याचं फुल तुम्ही,
सुगंध कुपीत ठरणार नाही
बाप नावाच्या देवाचा,
थांग कधीच लागणार नाही...

पप्पा...एक मात्र सांगतो
केला खरा आज सायास,
तुम्हाला थोडं शोधण्याचा...
शोधला तेवढा सांगितला,
आधार आमच्या असण्याचा...

एक मात्र खरं,
तुमच्याशिवाय जमत नाही...
आई मार्फत बोललं तरी,
बोलल्याशिवाय राहवत नाही...

बाप नावाच्या पारिजातकाचं,
असंच काहीसं जीणं असतं...
ते समजून घेणासाठी,
प्रत्येकाला बापंच असणं भाग असतं...

खरंच पप्पा तुम्ही असता तर...
ममतेचा हा डोह तुडुंब भरला असता...
खरंच पप्पा तुम्ही असता तर...
प्रेमावरचा विश्वास इतक्या लवकर उडाला नसता...

पप्पा तुम्ही असता तर...
जग थोडं लवकर जिंकलं असतं...
कुणा बाप-लेकाचं प्रेम नजरेत खुपलं नसतं
पप्पा तुम्ही असता तर...
जगण्याला एक आधार आला असता
मरता-मरता जगणारा जीव आज इतका व्याकुळ झाला नसता

पप्पा तुम्ही असता तर...
जगण्याचं ओझं वाटलं नसतं
तुमच्या नसण्याचं दु:ख आज मनी दाटलं नसतं
पप्पा तुम्ही असता तर...
अश्रुरूपी वादळं ऊठली नसती
पाण्याने डबडबणारी नयनतळी इतक्या लवकर आटली नसती

पप्पा तुम्ही असता तर...
आम्ही सुद्धा हसलो असतो
हसता-हसता कधी अलगद तुमच्या कुशीत शिरलो असतो
पप्पा तुम्ही असता तर...
डोक्यावरचं छत हरपलं नसतं
तुमच्या या बछड्याचं कोवळं मन कधी करपलं नसतं

पप्पा तुम्ही असता तर...
जगण्याला काही औरच मजा आली असती
खरंच पप्पा तुम्ही असता तर...
आज सावली परकी झाली नसती
आज सावली परकी झाली नसती...!!!
================
================
बापाची गोष्ट

बापाचं नाव रामचंद्र
चंद्र कधीच काढून पोराच्या हाती खेळायला दिला होता
म्हणून फक्त मरताना म्हणावयाचा शब्द राम !
पोटाला चार इंची व्यासाचे काळेनिळे छिद्र..... ..
बाकी कसल्या बसल्या नळ्या लावलेल्या,
पाणी न लागलेल्या बोअर वेल सारखे
खोलवर गेलेले शुष्क डोळे...
छातीचा भाता चालतो,म्हणून श्वास आहे म्हणायचं !
डॉक्टरांनीही बापाची आशा बाप्पावर सोडलेली...

कितीही प्रेमळ असला तरी
नजरेतला धाक कायम असणारा
कधी कधी हात उगारणारा
ताठ कण्याचा बाप .... ..
आज गोळा होऊन पडला होता ...
बहुदा काही तासांचाच खेळ उरला होता..!

कधी एखादी गोळीही न घेताना दिसलेला बाप
औषधांच्या उग्र दर्पाने भारलेल्या दवाखान्याच्या बेडवर
शेवटचे दीर्घ श्वास संपवत होता...
आई कोपऱ्यात मृत्युंजय वाचत होती
आणि मला माझा बाप हवा होता !


डॉक्टरांनी डोळ्यात टॉर्च मारला
पण बुब्बुळांची हालचालही न करता बाप निघून गेला होता..
तो गेला तसा बाप शब्दातला रामही गेला होता ..
आता उरले आठवणीत खोलवर कुठेतरी,
अजिबात राम नसलेले बाप नावाचे सुतक !

माहीत असला नसला, जीवंत असला नसला
तरी निसर्गतः जन्मणाऱ्‍या प्रत्येकालाच असतो,
आईच्या बरोबरीने एक बाप ..!

बाप म्हणजे बाप, बाप म्हणजे आधार
बाप म्हणजे आईच्या उबदार मायेला
कणखर कण्याचा धाक !
बाप म्हणजे चालता चालता धडपडताना पकडायचं बोटसुध्दा..
आणि दहा दिशात भरकटून भरकटून
हताश झाल्यावरसूध्दा माथा टेकवायला
सुरक्षीत घरट्याचं दार म्हणजे बापच !

पहील्या दिवशी रडत रडत आकांडतांडव घातला तरी
खंबीरपणे शाळेत ढकलून, निघून येणारा तोही बापच !
वीजा कडाडणाऱ्‍या भर पावसात छत्री घेऊन घरी कडेवरून
घेऊन जायला येणारा असा आठवतो तोही बापच !

प्रगती पुस्तकावर काही वाईट शेरा नसला तरी,
ज्याला दाखवताना धाकधूक व्हायची
तो प्रगतीच्या रस्त्याला धाडणारा तोही तोच तो बाप !

आईही कतृत्ववान असतेच
अन बापाच्या पोटातही माया असते..,
तरीही या स्त्री-पुरुष समतेच्या युगातही
माया आईची असते आणि कर्तुत्व बापाचेच

परवाच खांदा द्यायला गेलो होतो कोणाच्या तरी बापाला ..!
तिथे स्मशानात बोलता बोलता कोणीतरी कुजबुजले,
“ काय सांत्वन करणार ? ज्याचा जातो त्यालाच कळतो बाप. ”
आणि भडभडून आठवण आली आठवणीत गेलेल्या बापाची..!
हमसुन हमसुन रडलो... ..
जेव्हा होता तेव्हा कळला नाही.. कळला तेव्हा उरला नाही तो बाप !

शेवटी मीच माझा बाप होऊन, माझ्यातल्या बापाचं सांत्वन करु लागलो..
जो जातो, तो कान का ठेवून जातो ?
ठेवले जरी कान अगदी निट जपून...
तरी त्यातला ऐकणारा कुठे शिल्लक असतो ?

लागलेल्या दह्यातलं विरजण बाजुला का करता येतं ?
मग मागायचा ठरवला तरी,
मागायचा कसा बाप्पाला आपला गेलेला बाप ?
आणि गेलेला असला तरी, जाण्यासाठी मुळात
आपल्याला होता तरी बाप !
त्या बिचाऱ्‍या बाप्पाला,.. आठवणीत ठेवायला तरी,
असतो का कधी बाप.. ?

जाण्याचं दुःख तर प्रत्येकालाच असतं
म्हणून का कण्याने उन्मळून घ्यायचं ?
नाही राहीलो कण्यानं ताठ तर
जर असता आता बाप
तर काय वाटलं असतं त्याला ?
म्हंटला असता ना तो की,
' अरेरे माझा बच्चा कणा मोडून, सरपटणारा प्राणी झाला ! ? '
आणि म्हंटला असता पुढे आणखी
' जरा चाचपड तुझ्या गात्रागोत्रात , आहे मी तुझ्याच कणाकणात ...,
विरजण दिसत नसलं तरी वेड्या
तेच तर सगळ्या दह्यात पसरलेलं असतं ! '
उलट आता पूर्ण दही म्हणून लागायचं
अन आपल्या बापाच्या नातवंडा पतवंडांसाठी
विरजणाला म्हणून उरायचं ?
बापाचं बाप सामर्थ्य आता आपल्या मणक्यात ओतायचं !
कितीही संकट आली तरी बापासारखंच
धीराने हसायचं !..
तेव्हा आधाराला कुशीत जायचो ..,
आता आपण पिल्लांना कुशीत घ्यायचं !

येणारा जातच असतो
मात्र जायच्या आधी नुसतंच जन्म देऊन नाही,
पूऱ्‍या सामर्थ्याने आई किंवा बाप व्हायचं !

असंच तर असतं अरे जगायचं !
आधी कोणाच्या अंगा खांद्यावर खेळायचं !
मग उभ्या अंगाने कोणाच्या खांद्याला जायचं !
आणि
शेवटचं पुन्हा आपलं रीकामं अंग
कोणाच्या खांद्यावरून जायचं !
-आशुतोष राम आपटे
[ आपट्याची पानं ]
kavita on father marathi
poems on father-daughter relationship
marathi kavita on father and daughter
poem on parents in marathi
marathi kavita baap
father quotes in marathi language
baap kavita in marathi
charoli in marathi on mother
quotes on father in marathi
retirement speech for dad in marathi
baba vr kavita
baba chi athavan kavita
aai bapachi marathi kavita
sun marathi kavita
daughter quote in marathi
full kavita in marathi
poem for mom and dad anniversary in marathi
poem on father in hindi
birthday wishes for father
happy fathers day poem in marathi
marathi poem on parents
bapavar kavita
maze baba poem in marathi
father's day special kavita in marathi
babanchi athavan kavita
maharashtra varun kavita
marathi aai baba kavita

No comments:

Post a Comment